लातूर : विनोद उगीले
अल्पवयीन मुलांना मैत्रीच्या पहिल्या पायरीवर नेऊन हीच मैत्री पुढे टोकाच्या भूमिका घ्यायला भाग पाडणारी म्हणून शाळा, कॉलेजच्या परिसरात तसेच शिक्षणा बाबतीत आघाडीवर असलेल्या लातूर शहरातील वाढलेले कॅफे ही मोठी समस्या केंद्र निर्माण झाली आहे. पहिली ओळख, पुढे मैत्री, त्यानंतर कॅफेचा आडोसा आणि लॉजवरची अखेर ही जीवन उद्ध्वस्त करणारी कहाणी अगदी काही दिवसांत तयार होताना पाहायला मिळत आहे.
अंधार व आडोसा अशी कॅफेची रचना आणि त्यामध्ये मिळणारी संशयास्पद पेय याकडे तसेच अल्पवयीन मुला- मुलींना थेट प्रवेश देऊन आपला गल्ला भरणारे लॉजचालक यांच्याकडे स्थानिक महानगरपालिका, प्रशासन किंवा पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातूनच भयानक, किळसवाणे प्रकार घडू लागले आहेत. किशोवयीन मुलांच्या पालकांची झोप उडवणारी ही स्थिती बदलण्याची सामजिक गरज बनली आहे. देशाला शिक्षणाचा नवा पॅटर्न देणा-या तसेच शैक्षणिक व सांस्कृतीक वारसा असलेल्या लातूर जिल्ह्यात व शहरातील लातूरातील असे कॅफे लक्ष वेधून घेतात.
शैक्षणिक व सामाजिक सलोखा कायम असल्याने लातूर शहरात कायम वास्तव्यास मोठी पसंती आहे. बहूतांश नागरिक विद्यार्थी बाहेरच्या तालुका, जिल्हा, राज्यातील आहेत, त्यांच्या विश्वासाला तडा जाणारी प्रकार घडली जात आहेत. अशा परस्थितीत पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष दिले पाहिजे. याबरोबरच ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुले शिक्षण घेतात अशा शाळा, कॉलेजच्या परिसरात शहरात उभे राहणारे कॅफे आणि तसे व्यवसाय यावरही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी करडी नजर ठेवली पाहिजे. आक्षेपार्ह प्रकार घडत असल्यास पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे.