मुंबई : काँग्रेस नेतृत्वाला कंटाळून काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेत्यांनी काँग्रेसला राम राम केला आहे. तर काही त्या वाटेवर आहेत. त्यातील काही जण कदाचित भाजपमध्ये प्रवेश करतील, तर काही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. महाराष्ट्र राज्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे काही वेळ आपण वाट पाहू. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल. ते भाजपमध्ये प्रवेश करतात की, अन्य कुठे जातात ही उत्सुकता तुमच्याप्रमाणे मला देखील असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, राज्यात काँग्रेस पक्षाला आणखी एक जबर धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला निरोप दिला आहे. या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. अशातच राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिकिया दिली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस मधील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या मागील कारण म्हणजे काँग्रेसचे ज्या पद्धतीचे अंतर्गत राजकारण आहे, त्या राजकारणाला कंटाळून साथ सोडून जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.