लखनौ : सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना दावा केला की ४ जून रोजी देश नकारात्मक शक्तींपासून मुक्त होणार आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळावर ही वक्तव्य केले आणि विविध मुद्द्यांच्या आधारे मोदी सरकारच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित केले.
अखिलेश यादव म्हणाले की, भाजपच्या खोट्या राष्ट्रवादामुळे देशाचे नुकसान झाले आहे. देशातील सामाजिक सलोखा बिघडवला. बंधुभाव संपवला. जाती विरुद्ध जाती आणि पंथ विरुद्ध पंथ उभे केले. संविधानाने दिलेले आरक्षण रद्द करण्याचा कट रचला गेला. बेरोजगारांची फसवणूक केली. अनेक ठिकाणी शासकीय नोकर भरतीचे पेपर फुटले, यासोबतच मोदी सरकारने जाणूनबुजून आपल्या मंत्र्यांना देशासाठी लढणा-यांविरुद्ध अपशब्द वापरायला लावले असा गंभीर आरोप अखिलेश यांनी केला.
भाजपने जनतेवर महागाई लादली
मणिपूर, हाथरस , महिला कुस्तीपटू, मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांच्यावर अत्याचार आणि अत्यंत वाईट वागणुकीचा विक्रम मोदी सरकारने दहा वर्षात केला. भाजपने इलेक्टोरल बाँडचा आर्थिक भ्रष्टाचार केला. याद्वारे नफेखोरीला पैसे मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले, ज्यामुळे महागाई वाढली आणि स्वत:च्या फायद्यासाठी भाजपने जनतेवर महागाई लादली, असा घनाघात अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर केला.