मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरूनच खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. निधी वळवून झाल्यावर सामाजिक न्याय मंत्र्यांच्या संतापाला काही अर्थ उरतो का?, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपये निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आला. यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी शिरसाटांवर निशाणा साधला.
लाडक्या बहिणींसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांचा निधी वळवण्यात आला आहे. म्हणजे एका योजनेसाठी राज्यातील इतर गरजूंची परवड सुरू आहे. निधी पळवून झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री आता निधी वळवून झाल्यावर राग व्यक्त करतात. आपल्या खात्यात काय सुरू आहे हे सुद्धा मंत्री शिरसाट यांना माहिती नाही. खात्याशी संबंधित मंत्र्यांच्या संमतीशिवाय निधी वळवला? निधी वळवून झाल्यावर सामाजिक न्याय मंत्र्यांच्या संतापाला काही अर्थ उरतो का? या सरकारचा कारभार प्रश्न उपस्थित करणारा आहे. सगळा दिखावा आहे,यांनी एक निर्णय घ्यायचा, दुस-यांनी टीका करायची आणि जनतेला भूलथापा द्यायच्या, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली.