पुणे : आपण सरकारमध्ये गेलो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत. मी जेवढं काम करतो आहे तेवढे दुसरे कुणी मायका लाल करू शकत नाही. आपले चॅलेंज आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोणत्याही कामाचे घ्या असेही अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार झाला. त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यकर्ता
मेळाव्यात अजित पवार बोलत होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पहिले पाणी प्यायला, दुसरे शेतीला आणि तिसरे उद्योगाला पाणी. आधी दुस-यांदा उद्योगाला पाणी देण्याचा निर्णय होता. पण तो निर्णय आम्ही बदलला आणि शेतीला प्राधान्य दिल्याचे अजित पवार म्हणाले.
दिलेल्या संधीचे सोने करा. लग्न पत्रिकेत फक्त प्रेषक म्हणून पदाचे नाव टाकायला उपयोग करू नका, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. मलाही साखर कारखान्याचे काहीही कळत नव्हते. पण अभ्यास केला आणि समजून घेतल्याचे अजित पवार म्हणाले. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांसोबत काम करा.
मुलाचे नाव लिहिताना आईचे नाव लिहावे लागणार
मंत्री अदिती तटकरे यांनी चौथे महिला धोरण आणले, ते आम्ही मान्य केले. फार बारकाईने हे महिला धोरण राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आधी मुलाचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव असे लागायचे. आता मुलाचे, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असे लावावे लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले. महिला हा देखील समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. महिलांच्या नावावर घर घेतले तर १ टक्का व्याज कमी लागते, असे अजित पवार म्हणाले.