मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री होण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महायुतीत अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद असले तरी राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही त्यांच्याकडेच आहेत. मात्र असे असले तरी अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत इच्छा कायम आहे.
मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातही अजित पवारांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. मात्र आता अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असे राही भिडे म्हणाल्या. आपल्याला सगळ्यांना तसे वाटत असते, पण शेवटी योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावंसं पण कुठं जमतंय. कधी ना कधी तो योगही जुळून येईल, नाही असं नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
आपल्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, असे विधान केल्यामुळे चर्चांना सुरुवात झाल्याने अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री होणार हे गमतीने म्हटलं होतं. मी जर तसे म्हटलं असेल तर ते विधान मागे घेतो. त्यामुळे आता तो प्रश्न मिटला आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
कार्यकर्त्यांची इच्छा असली तर १४५ आमदारांचा पाठिंबा मिळाला तरच इच्छा पूर्ण होईल. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे १४५ पेक्षा जास्त आमदारांनी पाठबळ दिले आहे, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, १९९० पासून ते २०२५ पर्यंत आणि फक्त १९९५ ते १९९९ आणि २०१४ ते २०१९ चा अपवाद वगळता अजित पवार कायम सत्तेत राहिले आहेत. तसेच त्यांनी आजवर महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रमही केला आहे.