24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा जोर वाढला; ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढला; ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई- पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. हवामान खात्याकडून राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासांत कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावासाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

तसेच, राज्यातील ९ जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती या ९ जिल्ह्यांना पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय, संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पालघरलाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. मुंबईतील दादर, लालबाग-परळसह वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवलीत रात्रीपासून कोसळधार सुरू आहे. तर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्येही जोरदार पाऊस बरसतो आहे. त्याशिवाय, वसई, विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागातही पावसाचा जोर वाढला आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण ७० टक्के भरलं असून धरणाच्या विद्युतविमोचनातून १४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.

पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याला पुढील तीन दिवस हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पंचगंगेची पाणी पातळी सकाळी आठ वाजता ३५ फूट ७ इंचावर होती. तर जिल्ह्यातील एकूण ७६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR