कळंब : सतीश टोणगे
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लहान-मोठ्या निवडणुकीत युवा वर्गाचा मोठा सहभाग असतो. तरुण वर्ग सहभागी झाल्याशिवाय निवडणूक असल्यासारखी वाटत नाही. पण याच युवा वर्गाच्या भविष्याकडे कुणाचेही लक्ष नाही. केंद्राच्या विविध योजना प्रत्येक जिल्ह्यात राबविल्यास सुशिक्षित बेकारांची संख्या नक्की कमी होईल, एखादा आठवणीत राहण्यासारखा मोठा प्रकल्प मराठवाड्यात का येऊ शकत नाही..? गावोगावची वाढती संख्या चिंताजनक आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनांकडे वळू लागला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने राज्यातील चांगले प्रकल्प बाहेर का जात आहेत.. राज्य खिळखिळे करून काय साध्य करायचे आहे?, अशी चर्चा आता ग्रामीण भागात होऊ लागली आहे.
सध्या महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री झोपेत आहेत काय..? राज्यातील वाढत्या बेरोजगारीला कोण जबाबदार..? याचे उत्तर राज्यातील जनता विचारू लागली आहे. उच्चशिक्षित होऊनही नोक-या नाहीत. निवडणुकीत कोणाचा तरी समर्थक होऊन प्रचार करायचा, निवडून आल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांचा विसर सर्वच पक्षातील उमेदवाराला पडत असल्याने तरुणांची निराशा होत आहे. मराठवाड्यात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे.
शेतक-यांच्या आत्महत्या, हाताला काम नाही, म्हणून तरुणांनी आत्महत्या करण्याची वाट शासनकर्ते पाहत आहेत काय? अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे. महाराष्ट्रात एक तर कंपन्या येत नाहीत व त्यांना आणण्याचा कोणी प्रयत्न पण करत नाही. पण ज्या आहेत त्याही राज्याच्या बाहेर जाऊ लागल्या आहेत, नेमकं राज्यात चाललंय तरी काय..? असा प्रश्न विचारला जात आहे. लवकरच लोकसभा अस्तित्वात येईल, प्रत्येक जिल्ह्याच्या खासदारांनी बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी एखादा मोठा प्रकल्प आणावा, जेणेकरून तो सर्वांच्या लक्षात राहील व बेरोजगारीही हटेल….