मुंबई : फक्त ३ महिन्यांत जर ७६७ शेतकरी आत्महत्या करत असतील तर हे सरकार नेमके कोणासाठी चालत आहे? महाराष्ट्र हे सर्वाधिक आत्महत्या करणा-या शेतक-यांचे राज्य ठरत आहे. शेतक-यांशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्त्वाचा आहे? स्थगन प्रश्नावर चर्चा करणे गरजेचे आहे. शेतक-यांना कर्जमाफी करतो नुसते सांगितले जाते पण कर्जमाफी दिली जात नाही. त्याउलट लोणीकर, कृषिमंत्री कोकाटे यांच्यासारखे मंत्री शेतक-यांचा अपमान करतात, असे म्हणत विरोधक आक्रमक झाले होते.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून गुरुवारी तिस-या दिवसाच्या सुरुवातीलाच शेतक-यांच्या प्रश्नांवर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरा दिवस हा नाना पटोले यांच्या एका दिवसाच्या निलंबनामुळे गाजला. तर, तिस-या दिवशी शेतक-यांच्या मुद्यावर विरोधक विधानसभा सुरू होण्याआधी आणि विधानसभेतही आक्रमक दिसले. विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासापासूनच शेतक-यांच्या प्रश्नावरून गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावावर चर्चा नाकारल्यानंतर विरोधकांनी काहीकाळ विधानसभेत गोंधळ घातला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील विरोधकांवर टीका केली.
प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला चांगलेच फटकारले. यावेळी ते म्हणाले की, महामार्ग करण्यासाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का? शक्तिपीठ महामार्गाला दणक्यात २० हजार कोटी रुपये देऊ शकता, पण शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी तुमच्याकडे पैसे नाहीत? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
नुकताच सोशल मीडियावर एका शेतक-याचा व्हीडीओ समोर आला होता. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी स्वत: वखर चालवतानाचा हा व्हीडीओ आहे. हा मुद्दा विरोधकांनी उचलला.
सरकारला जाब कधी मागायचा? : आ. भास्कर जाधव
‘लातूर जिल्ह्यातील एका शेतक-याकडे बैल घेण्यासाठी पैसे नाहीत. अशावेळी स्वत: तो जू खांद्यावर घेऊन नांगरताना दिसत आहे, त्याची ७० वर्षांची पत्नी डोळ्यामध्ये पाणी आणून जोत हाकते आहे. नवरा हा बैलाच्या जागी जुंपला गेला आहे. अधिवेशन चालू असताना मग आम्ही सरकारकडून जबाब मागायचा नाही तर मग कधी मागायचा? एरवी सरकार वाटेल ती घोषणा करते, पण अधिवेशन चालू असताना सरकार शेतक-यांचे प्रश्न ऐकून घेत नाही. मग, कसले शेतक-यांचे सरकार? असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी केला आहे.
सरकारविरोधात गैरसमज पसरवण्याचे काम : अजित पवार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर म्हणाले की, शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाचा प्रस्ताव शुक्रवारी मांडा, आपण पूर्ण दिवस यावर चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतक-यांच्या प्रश्नावर आताच चर्चा करा, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. सरकारविरोधात गैरसमज पसरवण्यासाठी विरोधकांचा गदारोळ सुरू आहे. विरोधक शेतक-यांच्या प्रश्नावर राजकारण करत आहेत.’’ असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.