मुंबई : विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. त्या अनुषंगाने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. मतमोजणीसाठीच्या तयारीची त्यांनी माहिती दिली. तसेच जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, अशीही माहिती त्यांनी दिली.
राजीव कुमार म्हणाले की, मतदानाच्या जागृतीसाठी आतापर्यंत आम्ही १०० प्रेस नोट काढल्या आहेत आणि ३१२ मिलियन महिला मतदारांनी मतदान केलं आहे. १३५ ट्रेन या निवडणूक कर्मचा-यांना घेऊन जाण्यासाठी चालत होत्या, १६९२ कर्मचारी हेलिकॉप्टरने पोहोचले. देशातील असा कुठलाही कोपरा नाही की तिथे निवडणूक कर्मचारी पोहोचले नाहीत. यांच्याबद्दल जेंव्हा कोणी आरोप करतात तेव्हा त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील, याचा विचार करावा.
पुढे बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, जम्मू काश्मीरमधे ५८.५८ टक्के मतदान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी आता आम्ही लवकरच मतदान घेणार आहोत. मणिपूरमध्ये ९४ विशेष मतदान कक्ष बनवले होते, ही आपल्यासाठी सक्सेस स्टोरी आहे.
मंगळवारी होणा-या मतमोजणीबद्दल बोलताना राजीव कुमार म्हणाले, मतमोजणीदरम्यान जिल्हाधिकारी यांच्यावर कुठेही दबाव टाकू नये यासाठी ६ राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना हटवलं आहे. राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना त्या-त्या पदावरून दूर केलं आहे. मतमोजणी दरम्यान काय-काय काळजी घ्यायची आहे त्याची प्रोसेस ठरली आहे. १० कोटी ३० लाख बूथ आहेत, प्रत्येक हॉलमध्ये ४ टेबल, प्रत्येक पक्षाचा मतदान प्रतिनिधी असेल.. ही सगळी प्रोसेस ७०-८० लोकांमध्ये होत आहे, असं त्यांनी सांगितलं.