मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीने अंतर्गत समन्वय साधण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. येत्या २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी महायुतीचे सर्व मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते एकत्र येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका भव्य स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑगस्टच्या या ‘डिनर डिप्लोमसी’ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, या स्नेहभोजनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: आमदारांना आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि युती धर्म पाळण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्याची दाट शक्यता आहे.
आमदारांमधील समन्वय आणि ‘क्रेडिट वॉर’ संपवण्याचा प्रयत्न
गेल्या काही महिन्यांत महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि स्थानिक आमदारांमध्ये विविध शासकीय योजनांच्या श्रेयवादावरून आणि जागावाटपाच्या मुद्यावरून जाहीर वक्तव्ये पाहायला मिळाली होती. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी एकमेकांवर उघडपणे टीका केल्यामुळे महायुतीच्या प्रतिमेला फटका बसत असल्याची जाणीव वरिष्ठ नेतृत्वाला झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अधिक जास्त समन्वय असावा, विकासाच्या दृष्टीने एकत्रित काम व्हावे आणि सार्वजनिकदृष्ट्या होणारे मतभेद पूर्णपणे थांबवले जावेत, यासाठी हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार यशाचा गुरुमंत्र
२५ ऑगस्टच्या या ऐतिहासिक बैठकीत केवळ स्नेहभोजन होणार नसून, आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी एक ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित सर्व मंत्री आणि आमदारांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. फडणवीस तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींना कडक निर्देश देण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचे सरकार टिकवून ठेवण्यासाठी अंतर्गत बंडखोरी कशी रोखायची, यावरही या मार्गदर्शनात भर दिला जाईल.
महायुतीत ‘ऑल इज वेल’
एकाच व्यासपीठावर तिन्ही पक्षांचे सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेते एकत्र येऊन जेवण करणार असल्यामुळे, महायुतीत कोणताही बिघाड नसून ‘ऑल इज वेल’ आहे, असा मोठा राजकीय संदेश यातून विरोधकांना आणि जनतेला दिला जाणार आहे.
















