सोलापूर:अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणी वाढतच असून दोन वेळा मुदतवाढ देऊनही नियोजित तारखेला गुणवत्ता यादी प्रसिध्द होऊ शकली नाही. आता अंतिम गुणवत्ता यादीसाठी २६ जून ही तारीख निश्चित केली असून २७जूनपासूनच विद्यार्थ्यांना निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या या गलथान कारभाराविषयी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अकरावी प्रवेशासाठी यंदा प्रथमच केंद्रीभूत पध्दतीने ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वी दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी सराव करण्याकरिता पोर्टल सुरु करण्यात आले होते. या सरावावेळी आलेल्या अडचणी व त्यातील त्रुटी विद्यार्थी, पालक व शिक्षणतज्ज्ञांनी निदर्शनास आणून देत ऑनलाइन प्रवेश प्रणालीत तांत्रिक बदल करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार बदलही केला. परंतु प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेवेळीही या अडचणी आल्या. संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांच्या नोंदणीत अडथळा निर्माण झाल्याने प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला. याचा विद्यार्थी व पालकांना मनस्ताप झाला तर दुसरीकडे प्रवेशासाठी नव्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली. दरम्यान, नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यातही शिक्षण विभागाची दमछाक होत आहे.
आता विद्यार्थी हित लक्षात घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हे कारण देऊन शिक्षण संचालनालयाने गुणवत्ता यादीसाठी २६ जून ही तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर २७ जून ते ३ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी रिक्त जागांसाठी दूसरी फेरी जाहीर करण्यात येणार आहे.
दरवर्षी दहावी परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होत
असल्याने अकरावी प्रवेशासाठी विलंब होत होता. त्यामुळे महाविद्यालये उशिरा सुरू करावी लागत होती. यंदा शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल पंधरा दिवस अगोदरच म्हणजे मे महिन्यातच अनपेक्षितपणे जाहीर केला. त्यामुळे यंदापासून अकरावीचे वर्ग लवकर सुरू होतील अशी अपेक्षा होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे याला खो बसला आहे. मागील दिवसच पुन्हा पुढे आले आहेत. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली असून ऑनलाइन यंत्रणेला अडथळे येत असतील तर महाविद्यालय स्तरावर ऑफलाइन प्रवेशाला परवानगी द्यावी अशी मागणीही पुढे येत आहे.