24.5 C
Latur
Thursday, June 26, 2025
Homeलातूर‘आरटीई’ प्रवेश; पाल्यांच्या पालकांना मोठा धक्का!

‘आरटीई’ प्रवेश; पाल्यांच्या पालकांना मोठा धक्का!

लातूर : एजाज शेख
शिक्षणाचा हक्क कायदा (राईट टू एज्युकेशन-आरटीई) अंतर्गत मोफत शिक्षण घेणा-या हजारो विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. ‘आरटीई’चे शुल्क शासन देत नसल्यामुळे आता शिक्षण संस्थाचालकांनी सदर शुल्क पालकांकडूनच वसुल करण्याचे फर्मान काढले आहे. तशा नोटीसाही पालकांना बजावल्याने ‘आरटीई’त प्रवेश घेतलेल्या पाल्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. आता यातून मार्ग कसा काढायचा, या चिंतेत पालक असून इंग्रजी शाळांमध्ये असा प्रकार सर्रासपणे घडत आहे. त्यामुळे संबंधीत यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.  ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शासन ठरावीक दराने शाळांना प्रतिपुर्ती स्वरुपात देते. प्रतिपुर्तीची ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेने ‘आरटीई’ पोर्टलवर आपले शुल्क दर नोंदवणे आवश्यक आहे. मात्र, अनेक खाजगी शाळांनी शासनाच्या या अटीकडे जाणीपुर्वक दुर्लक्ष केले आहे. यावर शासनाने कठोर भूमिका घेत ज्या शाळांनी शुल्काची नोंदणी केली नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच इशारा दिला आहे.
मोफत शिक्षण आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम अंतर्गत खाजगी विनाअनुदानीत शाळांनी प्रवेश स्तरावर  त्यांच्या एकुण क्षमतेपैकी २५ टक्के जागा वंचित आणि  दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. या विद्यार्थ्यांची प्रतिपुर्ती शासन शाळांना देते. मात्र, यासाठी शाळांनी आपले शुल्क दर ‘आरटीई’ पोर्टलवर नोंदणवणे आवशयक असते. मात्र, असंख्य शाळांनी आजवर त्यांची ‘टर्म फी आणि ट्युशन फी’ चा तपशील ‘आरटीई’पोर्टवर भरलेलाच नाही. परिणामी शासनाला प्रतिपुर्ती रकमेचा अचुक अंदाज लावणे आणि निधी वितरणाचे नियोजन करणे अशक्य झाले आहे. शिक्षण विभागाने वारंवार सूचना देऊनही शाळांनी कोणतीही  हालचाल केली नसल्याने संबंधीत विभागाकडून सांगण्यात येत असले  तरी दुसरी बाजू मात्र वेगळीच आहे.
 सर्व सूचनांचे पालन करुनही, ‘आरटीई’  पोर्टलवर सर्व माहिती भरुनही शासनाकडून दोन-दोन वर्षे प्रतिपूर्ती केली जात नाही. त्यामुळे शाळा चालविताना कसरत करावी लागत असल्याचे शिक्षण संस्थाचालकांचे म्हणणे आहे.  लातूर शहरातील काही नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेतलेल्या पालकांना चक्क नोटीस पाठवून एक रकमी ४५ हजार रुपये भरण्याचे फर्मान काढले आहे. एका विद्यार्थ्याने सन २०१९-२० मध्ये ‘आरटीई’अंतर्गत पहिलीत प्रवेश घेतला होता. यंदा तो इयता ६ वीमध्ये जाणार आहे. परंतू, शाळेने त्याच्या पालकाला ४५ हजार रुपये एक रकमी भरण्याची नोटीस बजावल्याने त्या पालकाला मोठा धक्का असला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR