सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस योजनेतून १०० गाड्या सोलापूर महापालिकेला मिळणार आहेत. त्यासाठी सम्राट चौक परिसरात १० एमव्हीए क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू झाले आहे. दिवाळीनंतर (ऑक्टोबर-नोव्हेंबर) सुरवातीला ३० बसगाड्या आपल्याला मिळतील. त्यासंबंधीची माहिती केंद्र शासनाला कळविली आहे.असे सोलापूर महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांंनी सांगीतले.
केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस’ योजनेतून सोलापूर महापालिकेला १०० ई-बस मिळणार आहेत. त्यातील नऊ मीटरच्या ३० बस नोव्हेंबर महिन्यात सोलापुरात दाखल होणार आहेत. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार महापालिकेने केंद्र सरकारला केला आहे.
दिवाळीनंतर प्रवाशांना अवघ्या ५ ते २० रुपयांत शहरातील कोणत्याही मार्गांवर प्रवास करता येणार आहे. या बसची आसनक्षमता ३५ प्रवाशांची आहे.
सोलापूरमध्ये तत्कालिन नगरपालिकेचा परिवहन उपक्रम १९४९ पासून सुरू झाला. सुरवातीला खान नामक व्यक्ती खासगी तत्त्वावर सेवा देत होते. त्यानंतर हा उपक्रम सोलापूर नगरपालिकेकडे हस्तांतरीत झाला. १९६५ साली सोलापूर महापालिका झाल्यावर तो उपक्रम महापालिकेतर्फे सुरू झाला. महापालिकेकडील या परिवहन उपक्रमाला आता ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. १७३ बसगाड्यांमधून दररोज पाच लाखांहून अधिक प्रवाशांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्वस्तात सेवा देणारा हा उपक्रम सध्या बंद पडण्याच्या स्थितीत आहे.
सध्या या उपक्रमाकडे अवघ्या २२ ते २५ बस उरल्या आहेत. महापालिकेच्या हक्काच्या बस थांब्यावर ‘बस कमी आणि रिक्षाच जास्त’ अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व बस थांब्यांची सद्य:स्थिती काय? याचा सर्व्हे सुरू केला आहे. ई-बस शहरात येण्यापूर्वी सर्व बस थांब्यांची दुरूस्ती केली जाणार असून त्याठिकाणी एकही रिक्षा थांबणार नाही, अशी व्यवस्था उभारली जाणार आहे.
वसंत विहार येथील महावितरणच्या विद्युत स्टेशनपासून सम्राट चौकातील चार्जिंग स्टेशनपर्यंत (अडीच किमी) वीजेचे कनेक्शन नेले जाणार आहे. त्याचा सर्व्हे झाला असून धर्मवीर संभाजी महाराज चौकाजवळील ॲम्बेसेडर हॉटेलजवळून चार्जिंग स्टेशनपर्यंत विजेची लाईन (३३ केव्ही) नेली जाणार आहे. त्यासाठी ठेकेदार नेमला असून ऑक्टोबर २०२५ पर्यंत त्यांनी काम पूर्ण करायचे आहे. चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने महावितरणला जागा हस्तांतर केली आहे. तेथे एकाचवेळी २० बसगाड्या चार्जिंग करू शकणार आहेत.
केंद्र शासनाच्या ई-बस सोलापुरात आल्यानंतर प्रवाशांना प्रत्येक मार्गावर अचूक वेळेत बस उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांना फोन पे, गुगल पेसह अन्य ॲपद्वारे क्युआर कोडवरून ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे. याशिवाय रोखीने आणि एटीएम कॉर्डद्वारे देखील तिकीटे काढता येतील. शालेय विद्यार्थीनींना क्युआर कोड असलेला मासिक पास दिला जाणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्तांनी दिली.
केंद्राच्या योजनेतून ९ आणि १२ मीटर अशा दोन प्रकारच्या ई-बस मिळणार आहेत. ९ मीटरच्या बसमध्ये ३५ तर १२ मीटरच्या गाड्यांमध्ये ४५ प्रवाशी बसू शकतात. या गाड्या केंद्र सरकारने नेमलेला ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार आहेत. प्रतिकिमी दर निश्चित झाला असून तेवढे पैसे मक्तेदाराला द्यायचे, उर्वरित उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल. तत्पूर्वी, मार्ग व थांबे निश्चित केले जाणार आहेत.
सोलापूर शहरातील रिक्षांची संख्या सध्या ४० हजारांपर्यंत असून रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांना किमान १० ते जास्तीत जास्त ६० रुपये द्यावे लागतात. दिवसा व रात्रीचे दर वेगवेगळे असून खासगी भाडे तर ३० ते १५० रुपयांपर्यंत आहे. या उलट परिवहनच्या बसमधून शहरात कोठेही प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ५ ते २० रुपयेच मोजावे लागतील. याशिवाय ‘सोलापूर दर्शन’ अशाही काही बसगाड्या असतील. त्यात ठरावीक रकमेचे तिकीट काढल्यावर दिवसभर त्या प्रवाशाला बसमधून शहरात कोठेही फिरता येणार आहे.