नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी (१ मे) ला समृद्धी महामार्गाच्या तिस-या व अखेरच्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला होता. पण महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले नाही. काही कारणास्तव लोकार्पणाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता हा मुहूर्त ठरला असून महामार्गावरील अखेरच्या टप्प्यातील इगतपुरी ते आमणे ७६ किलोमीटरचे लोकार्पण येत्या गुरुवारी (ता. ५ जून ) सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे होणार आहे.
यासंदर्भात ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांन यामुळे नाशिककरांना आता समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे प्रवास करता येणार आहे. नाशिक-मुंबई हा प्रवास आता अवघ्या तीन तासांतच होणार आहे. तर मुंबई नागपूर अंतर आठ तासांत गाठता येईल. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई व नागपूर ही दोन मोठी शहरे जोडली गेली असून त्याचे अनेक फायदे होणार आहेत.
शिवाय स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिस-या टप्प्याचे उद्घाटन होत असल्याने महाराष्ट्रासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण हे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर शिर्डी ते भरवीर या ८० किमीच्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे २०२३ ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. आता समृद्धी महामार्गाच्या तिस-या व शेवटच्या इगतपुरी ते आमणे ७६ किलोमीटरच्या टप्प्याचे लोकार्पण ५ जून ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे.
समृद्धी महामार्गाचा ६२५ किलोमीटरचा महामार्ग यापूर्वीच खुला झालेला आहे. मात्र शेवटच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही शासकीय पातळीवरून विलंब झाला होता. हे उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार की सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचीही चर्चा रंगली होती. अशातच १ मे ला पंतप्रधान मुंबईत होते. त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन होते. मात्र तरीही समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान मुंबईहुन नाशिकला जाण्यासाठी साधरण पावणेचार तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. मात्र समृद्धी महामार्गामुळे हा वेळ कमी होऊन अवघ्या अडीच ते तीन तासांवर येणार आहे. जवळपास सव्वा तासाची बचत होणार आहे. सुमारे ४० किलोमीटरचे अंतर घटल्याने ७.७४ किलोमीटरच्या शहापूर तालुक्यातील वाशाळा येथील राज्यातील सर्वात मोठ्या बोगद्यामुळे कसारा घाट ओलांडणे सोपे झाले आहे. या समृद्दी महामार्गाची एकुण लांबी ७०१ किलोमीटर आहे. तर रुंदी १२० मीटर इतकी आहे. ६ लेन आहेत. दरम्यान तब्बल २६ टोलनाके व ५ बोगदे आहेत.