परभणी : परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेले स्वतंत्र नेत्रचिकित्सा शस्त्रक्रिया गृह गेल्या तीन ते चार वर्षांपासून कार्यान्वित झाले नसल्याचा आरोप जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रच्या परभणी जिल्हा समितीने केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक निधीच्या वापराचे विशेष लेखापरीक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत जन आरोग्य अभियानाचे जिल्हा निमंत्रक तथा राज्य समन्वय समिती सदस्य सचिन देशपांडे यांनी आरोग्यमंत्र्यांना जिल्हाधिका-यांमार्फत निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, जिल्हा रुग्णालयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हस्तांतरण सुरू असतानाच स्वतंत्र नेत्रचिकित्सा शस्त्रक्रिया गृह उभारण्यात आले. मात्र, या प्रकल्पाच्या नियोजनात रुग्णहित, उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ तसेच भविष्यातील प्रशासकीय बदलांचा पुरेसा विचार करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासनाचा मोठा निधी खर्च करून सुविधा उभारण्यात आली असली तरी ती प्रत्यक्षात वापरात आलेली नसून आजपर्यंत तेथे एकही नेत्र शस्त्रक्रिया झालेली नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच प्रकल्पाचा पूर्णत्व अहवाल आणि आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करण्यात आलेला नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात निधी मंजुरीपासून बांधकाम, उपकरण खरेदी, देयके आणि अंमलबजावणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास १० ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय, परभणीसमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जन आरोग्य अभियान, महाराष्ट्रच्या परभणी जिल्हा समितीने दिला आहे.
















