बीड : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रभावी नेतृत्व आहे. मी त्यांच्यासोबत गेली २५ वर्षे काम करत आहे. ते आज ज्या पदावर आहेत, तिथून अधिक मोठे व्हावेत अशी आमची प्रार्थना आहे; पण सध्या ते जिथे आहेत तिथेच राज्याला त्यांची गरज आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना उपपंतप्रधान करायचे हे संघ किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: संजय राऊत यांनाच सांगितले असावे, त्याशिवाय ते एवढ्या आत्मविश्वासाने कसे बोलू शकतात? असा टोला पंकजा मुंडे यांनी राऊतांना लगावला आहे. तर मराठा आरक्षणसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांशी दर दोन तासांनी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेत आहे. संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला कसा न्याय देता येईल, यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करत आहे.
देशातील शेतकरी आनंदी
पंकजा मुंडे म्हणाल्या की, देशात गेल्या १० वर्षांत देशात रस्ते, हायवे, मेट्रो आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून नवीन उद्योग उभे राहत असून शेतकरी आनंदी आहे. तसेच लखपती दीदी आणि लाडकी बहीण यांसारख्या योजनांमधून महिलांचे सबलीकरण होत असून देश एका सकारात्मक प्रवासाकडे निघाला आहे.
















