छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य शासनाने मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. या घोषणेला आता नऊ महिने झाले. मात्र यावर अध्यादेश काढण्याशिवाय काहीही तरतूद झालेली नाही. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (गुरूवारी) पुन्हा मराठवाडा पाणी टंचाई बैठक घेतली. पण यावेळी त्यांना जुन्या घोषणांची आठवण करून देताच भर दुष्काळात त्यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला.
मराठवाड्याच्या विकासासाठी प्रत्येक सरकार मोठमोठ्या घोषणा करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील अशाच काही घोषणा करण्यात आल्या होत्या. पश्चिमी वाहिन्यांतील पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी स्वतंत्र १४ हजार ४० कोटींची तरतूद केल्याची घोषणा देखील करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात याबाबत कोणतीही ठोस हालचाल झाली नाही. अशात मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी गुरूवारी मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर बैठक घेतली. यावेळी पुन्हा पाणी प्रश्नावर उपाययोजनांच्या घोषणा केल्या.
जिल्हानिहाय तरतूद
छ. संभाजीनगर – २,००० कोटी
धाराशिव – १,७१९ कोटी
बीड – १,१३३ कोटी
लातूर – २९१ कोटी
हिंगोली – ४२१ कोटी
परभणी – ७०३ कोटी
जालना – १५९ कोटी
नांदेड – ६६० कोटी
एकूण : ७ हजार ८६ कोटी