लातूर : प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक भक्कम आणि व्यापक करण्यासाठी सर्व पदाधिका-यांनी ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीत लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिका-यांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. रोहिदास चव्हाण पुढे म्हणाले की, पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान शिवसेनेचा झंझावात-महाराष्ट्र व्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे उद्दिष्ट समोर ठेवून काम करणे गरजेचे आहे.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, सहसंपर्कप्रमुख प्रमुख चंद्रनाथ मुरळीकर, जिल्हा समन्वयक पप्पु कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य तानाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महिला जिल्हा संघटक जयश्रीताई उटगे, डॉ. शोभाताई बेंजरगे, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, शहरप्रमुख माधव कलमुकले, शिवराज मुळावकर, युवासेना जिल्हा अधिकारी दिनेश जावळे, औशाचे उपजिल्हाप्रमुख बजरंग जाधव, मुरूडचे बाळासाहेब डोंगरे, अविनाश रेशमी, भागवत वंगे, देवणी तालुका प्रमुख मुकेश सुडे, ग्रामीण तालुका प्रमुख कैलाश पाटील, तालुका प्रमुख शंकर रांजणकर, शिवसैनिक देविदास भोसले, महादेव भोसले, अॅड. चंद्रकांत भोसले, त्र्यंबक स्वामी, राजेंद्र कतारे, विष्णु कांबळे, यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
















