मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. देशपांडे आणि राऊत यांच्यातील या शाब्दिक वादामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या शक्यता मावळत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जबाबदारीचे भान ठेवून व्यक्त शिवसैनिकांनी व्यक्त व्हावे. असे महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी सर्वप्रथम, ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हा भावांमधील वाद मी बाजूला ठेवायला तयार आहे’, असे वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याने ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर मनसेचे मुंबई विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे हे सातत्याने ठाकरेंविरोधात आक्रमक वक्तव्य करत आहेत. या टीकेला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले होते.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. सेना-मनसे युती होण्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितापुढे सगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी शुल्लक आहेत. सर्व शिवसैनिकांना आवाहन आपण संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत. मराठी माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जबाबदारीचे भान ठेवून व्यक्त शिवसैनिकांनी व्यक्त व्हावे. आदेशावरुन, असे सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
संदीप देशपांडे यांची ठाकरे गटावर टीका
संदीप देशपांडे यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली होती. होय आम्ही नवीन आहोत, पण कधी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत.‘जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा’, असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी २० हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली, अशी बोचरी टीका संदीप देशपांडे यांनी केली होती.