मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना पक्षाचा आज ५९ वा वर्धापनदिन असून दोन्ही शिवसेना म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवेसना (शिंदे गट) आज वर्धापनदिन साजरा करणार आहेत. यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
ठाकरे गटाचा वर्धापनदिन षण्मुखानंद हॉलमध्ये तर शिंदे गटाचा वर्धापनदिन वरळी डोम येथे साजरा होणार आहे. पण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमची शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही तर मर्दांचा महासागर आहे, असे म्हणत शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे. शिंदे गटाने त्यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा नाही तर अमित शहा जे त्यांच्या पक्षाचे संस्थापक आहेत, त्यांचा फोटो लावावा, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. १९ जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष, अडथळे, संकटे आली. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना बलिदान करावे लागले. हे सर्व मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी करण्यात आले. पण गेल्या काही वर्षांपासून या पक्षाचे भय सध्याच्या सत्ताधा-यांना वाटले. त्यामुळे एखाद्या हिटलरप्रमाणे त्यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने या पक्षावर घाव घातला. पण असे असंख्य घाव आम्ही पचवले आहेत. या संपूर्ण काळात नवे लोक आले आणि अनेक सहकारी सोडून गेले, तरी या पक्षाला पुढे नेण्याचे कसब उद्धव ठाकरेंनी दाखवले, असे यावेळी राऊतांनी म्हटले.
तर, शिवसेना ही विरोधी पक्षात उत्तम काम करत आली आहे आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली, तेव्हा आम्ही सत्तेत असतानाही चांगले काम करून दाखवले. पण सत्ताधा-यांना शिवसेनेचे भय कायम वाटत आले आणि ते वाटायलाच हवे अशा प्रकारे या संघटनेची बांधणी शिवसेनाप्रमुखांनी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केली असे संजय राऊत म्हणाले. तसेच, महाविकास आघाडीने मजबूतपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. ही अनेकांची भूमिका आहे. आम्ही एकत्रच आहोत, पण एकत्र राहत असतानाही शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही.
मराठी माणसाचा, हिंदुत्वाचा, अन्यायाविरोधात लढण्याचा तो विचार असेल, शिवसेनेची ताकद हीच विचारप्रणालीमध्ये आहे, स्वाभिमानामध्ये आहे. शिवसेना सत्तेसाठी कधीही कोणापुढे झुकली नाही, वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाहीत. शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा तर मर्दांचा महासागर आहे, असे म्हणत यावेळी राऊतांनी शिवसेना शिंदे गटाला टोला लगावला आहे.