नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून देशातील महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. आता महागाई कमी करण्यासाठी केंद्राने भारत तांदूळ बाजारपेठेत आणला आहे, पुढच्या आठवड्यापासून हा स्वस्तातील तांदूळ बाजारात मिळणार आहे. हा तांदूळ २९ रुपये किलो दराने मिळणार. तसेच दर शुक्रवारी दुकानदारांना तांदळाचा साठा सरकारला द्यावा लागणार आहे.
या योजनेबाबत केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी ही माहिती दिली. चोप्रा म्हणाले की, गेल्या एका वर्षात तांदळाच्या किरकोळ आणि घाऊक किमतीत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली. निर्यातीवर बंदी असतानाही किमती वाढतच आहेत. त्यामुळे किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने भारत तांदूळ बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. भारत तांदूळ नाफेड आणि एनसीसीएफ सहकारी संस्थांमार्फत २९ रुपये प्रति किलो दराने बाजारात विकला जाईल.
भारत राईस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही उपलब्ध करून दिला जाईल. पुढील आठवड्यापासून याद ब्रँड ५ आणि १० किलोच्या पॅकिंगमध्ये लोकांना उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात सरकारने ५ लाख टन तांदूळ किरकोळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे.
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने यापूर्वीच भारत आटा आणि हरभरा बाजारात आणला होता. पीठ २७.५० रुपये किलो आणि डाळ ६० रुपये किलो दराने विकली जात आहे. मंत्रालयाच्या नवीन सूचनांनुसार, किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यांना दर शुक्रवारी तांदळाचा साठा जाहीर करावा लागेल.