मुंंबई : निवडणुकीच्या तोंडावर राजीनामे आणि पक्षांतराचे जणू पेवच फुटते. आता या पक्षात असणारा नेता, उद्या त्याच पक्षात असेल याची कुणालाचा खात्री नसते. अशा सगळ्या वातावरणात, एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे आणि ते म्हणजे, शिवाजीराव आढळराव पाटील. कोणे एकेकाळी तत्कालीन राष्ट्रवादी पक्षात असलेले आढळराव पाटील पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत खासदारकीची हॅटट्रिक साधणारे, आढळराव आता अजित दादांच्या आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे, आढळरावांनाच उमेदवारीची माळ मिळणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.
शिवाजीराव दत्तात्रय आढळराव-पाटील. नाव जितके लांबलचक, तितकीच राजकीय कारकीर्दही मोठी आणि सध्या चर्चेतलंही मोठं नाव. त्याचं कारण आहे त्यांचा झालेला राजकीय प्रवास आणि तो म्हणजे राष्ट्रवादी ते राष्ट्रवादी व्हाया शिवसेना येत्या २६ मार्चला आढळराव पाटील राष्ट्रवादीत पुन्हा डेरेदाखल होणार आहेत. पण, आता आढळराव प्रवेश करत असणारी राष्ट्रवादी वेगळी आहे. तिचे रुपडे बदललंय, नेतृत्व बदलललंय आणि चिन्हही. कारण, ज्यांच्या बोटाला धरून आढळरावांनी राष्ट्रवादीत राजकीय पावलं टाकली. त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार नाहीत. तर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.