शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
वातावरणातील जागा उष्म्याने घेतल्याने नागरिक बेहाल झाले आहेत. शहर व ग्रामीण भागात उन्हाच्या तप्त झळा जाणवू लागल्या आहेत. विशेषत: दुपारी घराबाहेर पडणे अवघड झाले असून तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात देखील दुपारी बारा ते चारच्या दरम्यान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात शुकशुकाट बघायला मिळत आहे. तालुक्यात काही दिवसापुर्वी अवकाळी पावसानंतर उष्म्यापासून थोडासा दिलासा मिळाला होता. या नंतर मात्र उन्हाच्या कडाक्याने वातावरणात बदल झाला असून आबालवृद्धांना घामाच्या धारांना सामोरे जावे लागत आहे.वाढलेल्या उष्म्याचा पशु पक्षांनादेखील फटका बसू लागला आहे.अंगाची काहिली क्षमवण्यासाठी प्राणी-पक्षी पाणवठ्याच्या बाजूला घुटमळताना दिसत आहेत.
दरम्यान सध्या एप्रील महिन्याच्या सुरुवातीला वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत असल्याने नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत असून आणखी मे च्या महिन्यात देखील उष्णता कायम राहणार आहे. यंदा एप्रील मध्येच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने कामासाठी रणरणरत्या उन्हात घराबाहेर पडणा-या नागरिकांचा कल शितपेयांकडे वाढू लागल्याने शीतपेयगृह, रसवंतीगृह विक्रेत्यांचा व्यवसायही वाढत आहे. त्यामुळे चहा पिण्याची संख्या कमी होऊ लागली आहे. सध्या लग्नसराई असल्याने अनेक जण लग्नसमारंभासाठी घराबाहेर जायचे टाळत आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणेत देखील तरूणांची उणीव जाणवत असून सभेसाठी मंडपाची सोय करण्यात येत आहे. एकंदरीत या कडक उन्हाचा लग्नसमारंभ व प्रचारावर देखील प्रभाव पडला आहे.