मंगळवेढा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी ग्रामीण भागात येत असलेल्या उमेदवारांसह त्यांचे समर्थक व कार्यकर्ते ऐन उन्हाळ्यात कडक उन्हाने घामाघूम होत असल्याचे दिसून आले. तर कायमच दुष्काळाचा व कडक उन्हाचा सामना करावा लागणा-या शेतक-यांची अवस्था कशी असेल, अशी चर्चा या निमित्ताने समोर येऊ लागली.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले. ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाकडून १३ गावांत टँकर सुरू आहेत तर खासगी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १८ गावांत पाण्याचे टँकर सुरू आहेत. सध्या सूर्य आग ओकत असल्यामुळे उन्हाची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणा-या गावांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.
सध्या वाढत्या तापमानामुळे सकाळी दहापासून जनावरे व नागरिक झाडांच्या आस-याला जाऊ लागली. ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक आली. सोलापूर लोकसभेसाठी ७ मे रोजी होणा-या निवडणुकीसाठी जनमत आपल्याच बाजूने वळावे व पक्षीय भूमिका समजावून सांगण्यासाठी दोन्ही गटांकडून नेटाने प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये काही गटांकडून प्रचार सभेचे देखील आयोजन करण्यात येत आहे.
प्रचाराच्या धामधुमीत शीतपेयांचे दर दुप्पट
आठवडा बाजारानिमित्त भर दुपारी सभेत मार्गदर्शन करताना उमेदवारांसह त्यांच्या कडेला बसलेले समर्थक, कार्यकर्ते व त्यांचे भाषण ऐकायला आलेले नागरिक घामाघूम झाले तर कार्यकर्त्यांना ऊन लागू नये म्हणून पक्षीय उमेदवारांकडून छर्त्या, टोप्या वाटून तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय थकवा कमी करण्यासाठी थंड पिण्याचे पाणी, ंिलबू सरबत, लस्सी व थंडपेये घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता याही पदार्थांचे दर सध्या दुप्पट वाढले आहेत.