पुणे : प्रतिनिधी
आगामी महापालिका, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बरीच मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, दुसरीकडे काका-पुतण्या एकत्र येण्याबाबतही अनेक कयास बांधले जात आहेत. राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंशी युती करणार की, मविआत सामील होणार, याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. तर, दोन्ही राष्ट्रवादीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत आशावादी आहेत. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. तर काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे विविध बैठकांमध्ये एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहेत. पत्रकारांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया विचारण्यात आली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, हा माझा निर्णय नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातच शरद पवार यांच्या कामांची पद्धत तुम्ही सर्वांनी सहा दशके पाहिली आहे. शरद पवार जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते. त्यामुळे जो पक्षाचा निर्णय असेल तो निर्णय पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेईल. आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक घेत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, घरातील कार्यक्रम असतील तर आम्ही जातोच, एकत्र येतोच. आमची विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी बाकीच्या बाबतीत कुटुंब म्हणून सुख आणि दु:खामध्ये आपण नेहमी एकमेकांच्या बरोबर असतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते.