मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी होणार का? अशा चर्चांना वेग आला आहे.
माहितीनुसार, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला काय येऊ शकते याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली. याबाबत दोन्ही बाजूंनी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही परंतु मागील काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएचा घटक पक्ष होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशावेळी पाटील-तावडे भेट महत्त्वाची मानली जाते. शुक्रवारी दुपारी सव्वा तीन ते सव्वा सहा वाजेपर्यंत या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. या भेटीत एनडीएतील सहभागावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
विनोद तावडे यांच्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली. सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आल्यास दोन्ही राष्ट्रवादीचं भवितव्य काय असेल यावर या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी भेट झाल्याचे मान्य केले. परंतु ही भेट अनौपचारिक होती असे त्यांनी म्हटले. परंतु या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार या चर्चांनी जोर धरला आहे.
तर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी होणार का, तावडे-पाटील यांची भेट यावर पत्रकारांनी रोहित पवारांना प्रश्न केला. त्यावेळी याबाबतची कुठलीही चर्चा आमच्या पक्षात झाली नाही. आम्ही विद्यार्थी, शेतक-यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरत आहोत. त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या फक्त माध्यमात आहेत असा दावा रोहित पवारांनी केला. तर जयंत पाटील आणि विनोद तावडे यांनी एकत्र काम केले आहे. या दोघांमध्ये मैत्री आहे. त्यामुळे मैत्रीच्या नात्याने ते भेटले असावेत अशी प्रतिक्रिया मंत्री दत्ता भरणे यांनी दिली.
दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध तर्कवितर्क सुरू आहेत. अशा भेटी या राजकारणाचा नियमित भाग असतात. त्यामुळे केवळ एका भेटीच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही असे राजकीय तज्ज्ञ सांगतात. परंतु अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच या चर्चांवर पडदा पडण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत शरद पवारांची राष्ट्रवादी, भाजपा आणि महायुतीतील इतर पक्षांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















