लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिशा प्रतिष्ठान, लातूर संचलित ‘फिरता दवाखाना’ या उपक्रमाने यशस्वीपणे ६ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. ‘एक पाऊल माणुसकीचे-निरोगी आरोग्याचे!’ या ब्रीदवाक्याखाली सुरू असलेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या ६ वर्षांत दिशा प्रतिष्ठानने ३ लाखांहून अधिक रुग्णांना आरोग्यसेवा दिली.
दिशा प्रतिष्ठानतर्फे शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील १३२ हून अधिक गावांमध्ये आरोग्यसेवा पोहोचविण्यात आली आहे. आजपर्यंत ३ लाखांहून अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी व उपचार करण्यात आले असून, गरजूंना तज्ज्ञ डॉक्टरांकडे पुढील उपचारासाठी मार्गदर्शन व संदर्भही देण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत रक्तदाब, मधुमेह, प्राथमिक आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे वितरण तसेच पुढील उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जातो. या सेवेमुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांची सुमारे ३० कोटी रुपयांची बचत झाली असावी असा विश्वास दिशा प्रतिष्ठानने केला आहे. ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आज अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरला आहे. आरोग्यसेवेबरोबरच समाजात सेवाभाव आणि माणुसकीची भावना जोपासण्याचे काम दिशा प्रतिष्ठान सातत्याने करत असल्याचे संस्थेच्या पदाधिका-यांनी सांगितले. फिरत्या दवाखान्याच्या सहा वर्षांच्या यशस्वी प्रवासात सहकार्य करणारे डॉक्टर, दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि सर्व हितचिंतकांचे दिशा प्रतिष्ठानने आभार मानले असून, आगामी काळात ही सेवा अधिक व्यापक करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
















