कोल्हापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांचे भाषण हे वस्तुस्थिती आणि सत्यस्थितीवर आधारित नव्हते, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार म्हणाले, ज्या मूलभूत समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते, त्याबाबत पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. ते दुसरीकडे लक्ष वळवितात. यापूर्वी कधीही वस्तुस्थितीवर आधारित नसलेले पंतप्रधानांचे भाषण ऐकले नाही. राज्यात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत असल्याबाबत शरद पवारांनी आश्चर्य व्यक्त केले. पाच टप्प्यांतील निवडणुकीमुळे पंतप्रधान मोदींना जास्तीत जास्त सभा घेणे शक्य होते. सत्तेत असणा-यांना काळजी आहे, असा टोलाही माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार यांनी लगावला.
शरद पवार म्हणाले, ‘इंडिया आघाडीला मत दिले तर सत्तेत आल्यावर इंडिया आघाडीकडून धर्मावर आधारित आरक्षण दिले जाईल, असा पंतप्रधान मोदींनी अनेकदा आरोप केला. त्यावर माजी केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले, धर्मावर आधारित आरक्षणाचे विधान करून समाजातील तणाव वाढविण्याचा प्रयत्न आहे. आम्ही धर्मावर आधारित आरक्षणाबाबत कधीच बोललो नाही. ती मोदींची निर्मिती आहे. वारसा कर आणि संपत्तीच्या पुनर्वाटपावरून मोदी यांनी इंडिया आघाडीवर आरोप केले आहेत. त्याचाही काँग्रेसने जाहीरनाम्यात उल्लेख केला नाही, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.
राज्यकर्त्यांकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. पाच वर्षांत पाच पंतप्रधान हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला? इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून पंतप्रधानांच्या उमेदवाराबाबत निर्णय घेणार आहोत. निवडून येणे शक्य असलेल्या सर्व जागा लढविणार आहोत-राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट नाव न घेता शरद पवार यांना महाराष्ट्रातील ‘भटकती आत्मा’ असे म्हटले होते. जर त्यांना यश मिळाले नाही तर दुस-याच्या चांगल्या कामाचा नाश करतात. महाराष्ट्र त्यासाठी पीडित आहे’, असेही मोदींनी म्हटले. त्यावर शरद पवार म्हणाले, ‘केवळ मला आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात त्यांना समाधान मिळते.’ मतदानाच्या टक्केवारीवरही शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदानाची टक्केवारी काळजी करण्यासारखी असल्याचे राष्ट्रवादीच्या संस्थापकांनी म्हटले.