मुंबई : प्रतिनिधी
२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व कथित आरोपींची आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातील अनेक जणांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. आज मुंबईत विशेष न्यायालयाने या खटल्याचा निकाल जाहीर केला.
२९ सप्टेंबर २००८ रोजी हा स्फोट झाला होता. भिक्खू चौकात हा स्फोट झाला होता. अभिनव भारतचे नाव या स्फोटाने समोर आले होते. त्यानंतर गेल्या १७ वर्षांत या खटल्याने अनेक वळणं पाहिली. आज या खटल्याचा निकाल लागला. त्यात सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. त्यावर पीडितांनी नाराजी व्यक्त केली.
या स्फोटात शेख लियाकत मोईउद्दीन यांनी त्यांची मुलगी गमावली होती. त्यांनी माझी मुलगी वडापाव आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. नंतर कळालं तिचा देखील ब्लास्टमध्ये मृत्यू झाला. आजचा विशेष न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. खूप चुकीचा निर्णय झाला आहे. हेमंत करकरे यांनी अत्यंत सखोल तपास केला. अनेक पुरावे देखील सादर केले. तरी देखील निर्दोष मुक्तता झाली. आम्ही याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत.
इमानदार अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला होता. पण असा निकाल अपेक्षित नव्हता. आम्ही न्यायालयावर नाराज नाही. जे पुरावे सुरक्षा यंत्रणांनी मांडले, त्याआधारे एनआयए कोर्टाने निकाल दिला. आम्ही याच पुराव्यांआधारे या निकालाविरोधात वरिष्ठ कोर्टात दाद मागू. हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे एका पीडिताने मालेगावात सांगितले.