मुंबई : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणा-या मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल १७ वर्षांनी निकाल आला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, समीर कुलकर्णी यांनी माझे ९०० रुपये मला परत करा अशी मागणी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये समीर कुलकर्णी यांनी बॉम्ब बनवण्यासाठी लागणा-या स्फोटक रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप होता. आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी, ‘मला भोपाळमधून अटक करताना माझ्याकडून ९०० रुपये काढून घेतले आणि रेकॉर्डवर साडेसातशे रुपये दाखवले. ते ९०० रुपये मला परत मिळावेत. प्रश्न पैशांचा नाहीये’ असे म्हटले. कुलकर्णी यांनी असे म्हणताच यावर ‘कोणताही मुद्देमाल परत देण्याचा कोर्टाचा आदेश नाही’ असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
मी आनंदी आहे : निवृत्त मेजर रमेश उपाध्याय
याप्रकरणात निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आता त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘मी आनंदी आहे. कोर्टाच्या या निर्णयाने आमच्यावरचा डाग पुसला’असे रमेश उपाध्याय यांनी म्हटले.
निरपराध लोकांना गोवण्याच्या प्रयत्न : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार
‘जेव्हा हा खटला दाखल करण्यात आला तेव्हाच राज्य, देशामध्ये या विषयावर चर्चा झाली. काही निरपराध लोकांना गोवण्याच्या प्रयत्न होत नाही ना? या खटल्यामध्ये काही राजकारण तर होत नाही ना? अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. आज निर्दोष मुक्तता झाली तरी यामध्ये शंका व्यक्त केली. त्यामध्ये काहीतरी तथ्य होतं.
















