लोकसभेच्या मैदानात, अजित पवारांची मागितली माफी, अश्रू अनावर
अहमदनगर : प्रतिनिधी
मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवार यांची माफी मागतो. कारण तुम्ही मला ५ वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. पण आपल्याला लोकसभेला सामोरे जायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. निलेश लंके यांनी आमदारकी सोडून अहमदनगरमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला.
केवळ माझ्या जवळचे होते, म्हणून महसूल विभागातील ४७ कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. आजची वेळ निर्णय घेण्याची आहे. शेपूट घालून बसणारी औलाद आमची नाही. माझ्यावर वारंवार वार करण्याचा प्रयत्न केला. कोणी काही म्हणू पण यंदाची निवडणूक कम से कम दो लाख असे म्हणत २ लाख मतांनी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी व्यक्त केला.
निवडणूक जीवन-मरणाची
या निवडणुकीत स्वइच्छेने सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यासाठी ही निवडणूक जीवन-मरणाची आहे. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. तुमच्याकडे पैसे आहेत, पण आमच्याकडे माणसं आहेत. तुमचे हॉस्पिटल चालले पाहिजे, म्हणून तुम्ही सरकारी रुग्णालयासाठी काहीही केले नाही, असेही निलेश लंके म्हणाले.
सर्वसामान्य माणसामुळे
तुम्हाला घाम का फुटला?
राजकारण मला कोणती प्रतिष्ठा टिकवण्यासाठी करायचे नाही. मी राजकारण सर्वसामान्य जनतेसाठी करत आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांमुळे तुम्हाला का घाम फुटला. येणा-या काळात तुम्हाला दिसेल, सर्वसामान्य माणूस काय आहे. रावणाचा अंत झाला तुम्ही कोण आहात, असा सवाल निलेश लंके यांनी विखेंना केला.