रिओ दी जानेरो : ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल या राज्यात त्याचा सर्वाधिक कहर होत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. पुरामुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत.
ब्राझीलमध्ये या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर हजारो लोक बेपत्ता आहेत. बचाव पथक बचाव कार्यात गुंतले आहे. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार विनाशकारी पुरामुळे २८१ नगरपालिका प्रभावित झाल्या आहेत आणि किमान ७४ लोक जखमी झाले आहेत.
६७,००० हून अधिक लोक प्रभावित झालेल्या भागात स्थानिक सरकारने आपत्तीची स्थिती घोषित केली आहे आणि ४,५०० हून अधिक लोक तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आहेत.
काही भागात छतापर्यंत पाणी गेल्याचे चित्र दिसत आहे. बचाव पथके लोक आणि पाळीव प्राणी शोधण्यात व्यस्त आहेत. शनिवारी सकाळी, जोरदार पावसामुळे गुआइबा सरोवरातील पाण्याची पातळी पाच मीटरने वाढली, ज्यामुळे राज्याची राजधानी पोर्टो अलेग्रेला धोका निर्माण झाला, असे अधिका-यांनी सांगितले.
रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम नदीच्या बंधा-यांवरही होत आहे. १.४ दशलक्ष लोकसंख्येचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या पोर्टो अलेग्रेला पुराचा विशेष फटका बसला.
येथे, शहरातून वाहणारी गुआइबा नदी ५.०४ मीटर किंवा १६.५ फूट इतकी प्रचंड उंचीवर आहे, ती ४.७६ मीटरच्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त आहे. जी १९४१ च्या विनाशकारी पुरापासून रेकॉर्ड आहे.
पुरामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, घरापासून ते रस्त्यांपर्यंत सर्व काही पाण्याने भरलेले दिसत आहे. शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यांवर बोटी फिरत आहेत. बुडून घरे उद्ध्वस्त झाली आहेत. रस्त्यावर जिकडे-तिकडे वाहनेही अडकली आहेत.