ब-याच भागांत पावसाची हजेरी, आशा पल्लवित
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होणार आहे. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, मराठवाड्यात पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही. त्यामुळे आठही जिल्ह्यांत बिकट स्थिती आहे. मात्र, काही ठिकाणी २ दिवसांत हलक्या सरी कोसळल्या आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेकडील वा-याचा वेग वाढल्याने समुद्रात उंच लाटा उसळत असून, जोरदार वारे वाहत आहेत. समुद्रात ताशी अंदाजे ४० ते ५० किमीच्या वेगाने वारे वाहू लागले आहे. तसेच स्थानिक मच्छीमारांच्या माहितीनुसार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आज मुंबईच्या उपनगरात किंचित हलका पाऊस पडला. उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.
मराठवाड्यात अंबाजोगाई तालुक्यात सलग तिस-या दिवशी जोरदार पाऊस झाला. परंतु जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. लातूरमध्येही शहरात सरी कोसळल्या. सोलापुरातही तब्बल दीड महिन्यानंतर मुसळधार पावसाचे आगमन झाले. शहरातील विडी घरकुल, कुंभार वेस भागातील अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे सोलापूरकर सुखावले. विदर्भात गडचिरोलीसह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणात रायगडमध्ये पाऊस झाला. तसेच आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाच्या रिमझिम सरी सुरू झाल्या.
मालेगावमध्ये पूर
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सर्व परिसर जलमय झाला. नाशिकच्या पूर्व भागात कुठेच पाऊस नसताना फक्त जळकू येथे पावसाने धुवांधार बॅटिंग करीत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेताची माती वाहून गेली. तसेच पिकांचेही नुकसान झाले.
सेलूत विजांच्या कडकडाटासह पाऊस
सेलू : गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर आज विजांच्या कडकडाटासह सेलूत हजेरी लावली. पावसाळा सुरू झाल्यापासून संपूर्ण जून महिना कोरडाच गेला. जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात रिमझिम पाऊस पडला. त्यानंतर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पेरणी वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अर्ध्यातासापेक्षा जास्तवेळ पाऊस कोसळला.
















