37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्ररेणुका शहाणे विरुध्द चित्रा वाघ वाद पेटला

रेणुका शहाणे विरुध्द चित्रा वाघ वाद पेटला

गुजराती-मराठी मुद्यात महिला नेत्याची उडी

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील गिरगाव आणि घाटकोपर परिसरात घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी माणसाला डावलणा-यांना मत देऊ नका, असे आवाहन केले होते.

मराठी नॉटवेलकम महणणा-या आणि मराठी लोकांना घरं न देणा-या लोकांचे समर्थन करणा-या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका, असे रेणुका शहाणे यांनी म्हटले होते. रेणुका शहाणे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरून केलेल्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली होती. या सगळ्या वादात आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. त्यांनी रेणुका शहाणे यांना जाहीर पत्र लिहून काही सवाल विचारले आहेत. तुमचं टायमिंग पाहता राजकारणाची शंका येते असं चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटलंय, ‘जय महाराष्ट्र! आम्ही सर्व आपले खूप मोठे चाहते आहोत. ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे. भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणीव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तिचा मान व सन्मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.

आपण ट्विटमधून मराठी मतदारांना केलेल्या अवाहनाचे टायमिंग पाहता यामागे आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमध्ये स्व:त खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात.

मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतूकरता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुस-या भाषेचा आदरच केला आहे. आपणास एक प्रश्न विचारते की, कोविडमध्ये पीपीई किट्स, बॉडी बॅग्ज, मास्क, औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजनअभावी मरत असताना करोडो रुपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लुटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात उर्दू भवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतुपुरस्सर मौन बाळगणार का?

रेणुका शहाणे यांचे ट्विट
रेणुका शहाणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं, मराठी नॉटवेलकम म्हणणा-या लोकांना कृपया मत देऊ नका . मराठी लोकांना घरं न देणा-या लोकांचे समर्थन करणा-या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणा-या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR