पूर्णा : आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने आनंदनगर परिसरात आयोजित कार्यक्रमात तब्बल १ हजार डस्टबिनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला महिला, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. घरातील कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो योग्य पद्धतीने जमा करावा. स्वच्छतेची सवय प्रत्येक कुटुंबाने अंगीकारावी आणि शहराच्या स्वच्छतेत नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष विमलताई कदम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक तथा आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती मीरा होळकर, विश्वनाथ होळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणारा घरगुती कचरा लक्षात घेता कच-याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात डस्टबिन उपलब्ध झाल्यास कचरा रस्त्यावर फेकण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यामुळे परिसरातील स्वच्छता टिकवून ठेवण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही सकारात्मक परिणाम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना डस्टबिनचे वाटप करताना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले. घरातील कचरा नगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेकडे नियमितपणे देऊन परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, आ. डॉ. गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्वच्छतेचा विषय केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन सवयींचा भाग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्वच्छ शहरासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमास महिला, नागरिक, विविध मित्रमंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी डस्टबिनचा नियमित वापर करून घरगुती कचरा योग्य ठिकाणी जमा करण्याचा संकल्प व्यक्त केला. स्वच्छतेबाबत जनजागृती वाढविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात आले. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही सामूहिक जबाबदारी आहे. या भावनेतून राबविण्यात आलेल्या डस्टबिन वाटप उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
















