कोच्ची : केरळमध्ये यंदाच्या मोसमात पावसाने ओढ दिली असून १ जून ते २४ ऑगस्ट या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत केरळमध्ये १,६७१.४ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १,२७८.७ मिमी पावसाची नोंद झाली.
राज्यातील जिल्ह्यांचा विचार केला असता कन्नूर, कासरगोड, कोट्टायम, कोझिकोड, पथनमथिट्टा आणि तिरुवनंतपुरम या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सामान्य राहिले. मात्र उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. वायनाडमध्ये राज्यातील सर्वाधिक ५१ टक्के कमी पावसाची नोंद झाली. या जिल्ह्यात २,११४.७ मिमी पाऊस अपेक्षित असताना १,०३९.७ मिमी पाऊस झाला. त्यानंतर इडुक्कीमध्ये ४५ टक्के कमी पाऊस झाला. तेथे २,०९२.५ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत १,१४७.४ मिमी पावसाची नोंद झाली. कोल्लममध्ये सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला. त्रिशूरमध्ये २७ टक्के, लक्षद्वीपमध्ये २७ टक्के आणि पालक्काडमध्ये २६ टक्के कमी पाऊस झाला. अलप्पुझामध्ये २५ टक्के कमी पाऊस झाला. या जिल्ह्यात १,३०६.१ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ९८३.५ मिमी पाऊस झाला. एर्नाकुलममध्ये २२ टक्के, तर मलप्पुरममध्ये २१ टक्के कमी पाऊस नोंदवण्यात आला.
कन्नूरमध्ये २,२५६.१ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत २,०८१.१ मिमी पाऊस झाला असून तो ८ टक्के कमी आहे. कासरगोडमध्ये २,४६७.२ मिमीच्या तुलनेत २,०९३.५ मिमी पाऊस झाला असून तो १५ टक्के कमी आहे. कोट्टायममध्ये ७ टक्के, तर कोझिकोडमध्ये १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. पथनमथिट्टा जिल्ह्यात १,२५०.२ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत १,२२० मिमी पाऊस झाला. येथे सरासरीपेक्षा २ टक्के कमी पाऊस झाला आहे.
















