पुणे : गैरसमज आणि संताप यातून व्यक्ती कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. शालेय विद्यार्थ्यांमध्येही द्वेष, मत्सर वाढीला लागला आहे. यातून एखाद्याचे जीवन संपवण्यापर्यंत निर्णय घेतला जातो.
असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. मैत्रीच्या वादातून १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा कोयत्याने खून करण्यात आला आहे.
झोपेत असताना तरुणावर कोयत्याने आणि धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीत झालेल्या गैरसमजातून काही मिनिटांत मित्राचे आयुष्य संपवले गेले.
पुण्यातील पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी येथील आनंदवन सोसायटीत थरारक घटना घडली. प्रकाश हरिसिंग रजपूत असे १५ वर्षीय मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हत्येमागे शाळेच्या मैत्रीचे कारण सांगितले जात आहे. हल्लेखोर विद्यार्थी आणि मृत विद्यार्थी यांची एक कॉमन मैत्रीण होती. मैत्रीण प्रकाशसोबत बोलते मग माझ्यासोबत का नाही? नक्कीच प्रकाशने काहीतरी सांगितले असणार, असा हल्लेखोराचा समज झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. तो दररोजप्रमाणे शाळेत गेला. १०.३० वाजता शाळा सुटली आणि तो घरी आला. मणेरवाडी हद्दीतील मह डोंगरावरील आनंद सोसायटीत तो राहायला होता. फार्ममधील घरात प्रकाश झोपला होता. ही झोप आयुष्यातील अखेरची असेल असे त्याला स्वप्नातही वाटले नसेल.