मुंबई : देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पंतप्रधानांसह दिग्गज नेते, मंत्री आणि पदाधिकारीही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत देशातील संविधानाच्या मुद्द्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील, असा आरोप विरोधी पक्षाकडून, इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
काहीही झाले तरी संविधान बदलले जाणार नाही, स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी संविधान बदलले जाणार नाही, असेही मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे, संविधान हा मुद्दा यंदाच्या राजकारणात सर्वात अग्रस्थानी दिसून येत आहे. कर्नाटकमधील भाजपा खासदाराने केलेल्या विधानामुळेच हे वातावरण पेटले आहे. मात्र, भाजपाने आता या खासदार महाशयांचे तिकीट कापले आहे.
भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी संविधान बदलाची भाषा केली होती. अब की बार, ४०० पार या घोषणेचा संदर्भ देत त्यांनी हे विधान केले होते. मात्र, भाजपाने त्यांचं हे विधान गांभीर्याने घेतले असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतनिवडणुकीत त्यांनी तब्बल ४ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेतले होते. तरीही, भाजापने यंदा त्यांना उमेदवारी नाकारली आहे. बेळगाव कर्नाटकातील भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा लोकसभा मतदारसंघ असणा-या कारवारमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. भाजपने या मतदारसंघात सहावेळा विजय नोंदविला. मात्र भारतीय संविधान बदलण्यासाठी भाजपने चारसो पारचा नारा दिला आहे असे वक्तव्य करणारे अनंतकुमार हेगडे यांनाच बदलून टाकण्यात आले.
खासदार अनंतकुमार हेगडे यांनी गत २०१९ च्या निवडणुकीत तब्बल ६८ टक्के मतदान घेतले होते. मात्र, यंदा हेगडेंचे तिकीट कापून भाजपने सिरसी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसनेही याच मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक हरणा-या डॉ. अंजली निंबाळकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, यंदा या मतदारसंघात चूरस चांगलीच निर्माण झाली आहे. कारवार आणि बेळगाव जिल्ह्यातील आठ मतदारसंघात हा लोकसभेचा मतदार संघ पसरला आहे.