नुसता बलात्काराचा आरोप गैर, महिलेला सुप्रीम समज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अनेक पुरुषांवर बलात्काराचा आरोप केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, पण पोलिस तपासात सहकार्य करत नसल्याने एका महिलेला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले. नुसता बलात्काराचा आरोप करणे आणि पोलिसांना तपासात मदत न करणे हा कायद्याचा गैरवापर आहे. यातून त्या महिलेचा उद्देश वेगळा असू शकतो असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने एका निवृत्त लष्करी अधिका-याविरोधात केलेली याचिका रद्द केली. तसेच या महिलेने आरोप केलेल्या सर्व याचिकांवर उच्च न्यायालयाने लवकर निर्णय घ्यावा, अशा सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने दिल्या.
सुनावणीदरम्यान न्यायालयाला असे आढळून आले की अशाच प्रकारचे आरोप करणा-या इतर ८ लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने महिलेला नोटीस पाठवून बाजू मांडण्याची संधी दिली. मात्र तिने तसे केले नाही. एका ३९ वर्षीय महिलेने २०२१ मध्ये दिल्लीतील मेहरौली पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त आर्मी कॅप्टन राकेश वालिया यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचे औषध पाजल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता. याचिकाकर्त्याने दिल्ली उच्च न्यायालयाकडे हा पैसे उकळण्याचा डाव असल्याचे सांगत प्रकरण रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु उच्च न्यायालयाने त्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण या महिलेने अशाच प्रकारचे ८ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवल्याचे समोर आले. त्यावर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठाने हा न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे म्हटले.