मोदींचा संकल्प, लाल किल्ल्यावर १३ व्यांदा फडकविला तिंरगा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १३ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यावेळी लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम् गीताचे सूर निनादले. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होईपर्यंत २०४७ पर्यंत एक विकसित भारत घडवू. जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा जगाला आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या. देशाचे वर्क कल्चर बदलण्याची गरजही मोदींनी यावेळी व्यक्त केली.
जेव्हा एखादा देश आपली स्वप्ने साकार करतो आणि दृढ निश्चय व क्षमतेच्या बळावर पुढे वाटचाल करतो, तेव्हा तो महान बनतो. केवळ लहान स्वप्नांच्या आधारे एखादा देश आता तग धरू शकत नाही; भव्य स्वप्ने आपली क्षितिजे विस्तारतात. आपला निश्चय अढळ असायला हवा. आज भारतानेही एका दृढ निश्चयासह एक भव्य स्वप्न पाहिले आहे: ते म्हणजे १९४७ पासून स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होईपर्यंत आपण एक विकसित भारत घडवू. जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा जगाला आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे भाग पडते, असे मोदी म्हणाले.
अवघ्या १२ वर्षांच्या कालावधीत २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले. या १२ वर्षांत आपण एक प्रमुख आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलो आणि आता १४० कोटी भारतीयांचा संकल्प रोखणे कठीण आहे. गेल्या १२ वर्षांत संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात चारपट, खादी व ग्रामोद्योगांच्या उत्पादनात पाचपट आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सातपट वाढ झाली. रेल्वे डब्यांच्या निर्मितीत २१ पट आणि मोबाईल फोनच्या उत्पादनात ३३ पट वाढ झाली. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या चौपट झाली तर डिजिटल व्यवहारांमध्ये १०० पट वाढ झाली.
नळाद्वारे पाणीपुरवठा जोडण्या देण्याचा सरासरी वार्षिक वेग १५ पटींनी वाढला आणि गॅस जोडण्या पूर्वीच्या वेगाच्या तुलनेत सहापट अधिक वेगाने देण्यात आल्या. शौचालयांच्या बांधकामाचा वार्षिक वेग चौपट झाला आणि गरिबांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचे काम दरवर्षी तीनपट अधिक वेगाने झाले. भारताने आता इतर देशांवर अवलंबून राहू नये; त्याने आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. आपण आपली क्षमता वाढवली पाहिजे आणि आपल्या हितांचे रक्षण स्वत:च केले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
७०० शहरांत १.७५ कोटी
घरांपर्यंत गॅस पाईपलाईन
२०१४ पूर्वी ७० शहरांमध्ये पाईपद्वारे गॅसचा पुरवठा केला जात असे. गेल्या १२ वर्षांत आम्ही ७०० शहरांमधील १.७५ कोटी घरांपर्यंत पाईप गॅस जोडण्यांचा विस्तार केला आहे. २०१४ पूर्वी सौर ऊर्जेची क्षमता केवळ २ गिगावॅट होती; आज ती १६० गिगावॅट इतकी आहे. आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली. सध्या ५० लाख घरांमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
देशात रेल्वे जाळ््याचे
७० टक्के विद्युतीकरण
आम्ही रेल्वे जाळ््याच्या ७० टक्के भागाचे विद्युतीकरण केले आहे. विजेवर गाड्या चालवल्यामुळे पर्यावरणाला फायदा झाला आहे. देशाने आपली पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वेगाडी सुरू केली आहे. ही सर्वात लांब रेल्वेगाडी आहे.
















