पंढरपूर : प्रतिनिधी
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या मुखदर्शन व पदस्पर्शदर्शनासाठी पूर्णवेळ बंद राहणार आहे. २६ सप्टेंबरपासून दर्शन पूर्ववत सुरू होईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
२२ सप्टेंबर रोजी दिवसभर दर्शन सुरू राहणार असून रात्री दर्शन बंद झाल्यानंतर संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. मूर्तींचे पाविर्त्य आणि सुरक्षितता अबाधित ठेवून तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हे काम अत्यंत काळजीपूर्वक केले जाणार आहे. मूर्ती संवर्धनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या ७ ऑगस्ट रोजीच्या अंतिम आदेशाने न्यायालयीन अधिमान्यता मिळाली आहे.
यापूर्वी २२ ते २४ जूनदरम्यान संवर्धनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, न्यायालयीन स्थगिती तसेच त्यानंतर आषाढी यात्रेमुळे हे काम पुढे ढकलण्यात आले होते. मागील काळात १९८८, २००५, २०१२ आणि २०२० मध्ये मूर्तींचे संवर्धन करण्यात आले होते. यावेळी नियमित देखभालीच्या अनुषंगाने मूर्तींना संरक्षक आवरण देण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर आणि राज्य पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
भाविक व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
या संदर्भात १३ सप्टेंबर रोजी मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, खातेप्रमुख तसेच अरक व राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची नोंद घेऊन वारकरी, भाविक व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
















