कोलकाता : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धेला ब्रेक लागला होता. दोन्ही देशांच्या संमतीने शस्त्रसंधीची घोषणा झाल्यावर आयपीएलमधील उर्वरित सामने पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रद्द करण्यात आलेल्या सामन्यासह उर्वरित १७ सामन्यांचे सुधारित वेळापत्रकासह बीसीसीआयने स्पर्धेत नवा नियमही लागू केला आहे.
आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्यावर अनेक परदेशी खेळाडू मायदेशी परतले असून त्यातील काही खेळाडू पुन्हा आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परिस्थितीत आयपीएल फ्रँचायझी संघाचे टेन्शन कमी करण्यासाठी बीसीसीआयने बदली खेळाडूसंदर्भातील नियम नव्या तरतुदीसह लागू केला.
आयपीएल नियमानुसार, दुखापतग्रस्त असणा-या किंवा आजारी असलेल्या खेळाडूच्या रुपात बदली खेळाडूचा संघात समावेश करण्याचा नियम आधीपासूनच लागू आहे. पण हा नियम स्पर्धेतील पहिल्या १२ सामन्यांसाठी होता. त्यानंतरच्या सामन्यात हा नियम लागू नव्हता. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यावर पुन्हा उर्वरित सामने खेळवताना येणा-या अडचणी दूर करण्यासाठी बीसीसीआयने फ्रँचायझी संघांना तात्पुरत्या स्वरुपात बदली खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बदली खेळाडूसंदर्भातील नियमानुसार, फ्रँचायझी संघांना बदली खेळाडूच्या रुपात फक्त अशा खेळाडूला घेता येईल, ज्याने आयपीएलमध्ये नाव नोंदणी केली होती. याचा अर्थ अनसोल्ड राहिल्या खेळाडूला या नियमानुसार वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळू शकते. ज्या खेळाडूच्या जागी तो संघात येणार आहे, त्या खेळाडूपेक्षा अधिक प्राइज टॅग असणा-या गड्याचा संघात समावेश करता येऊ शकत नाही. एवढेच नाही तर बदली खेळाडूच्या रुपात संघात आलेल्या खेळाडूला पुढच्या हंगामासाठी रिटेन करता येणार नाही. पुढच्या वेळी त्याला लिलावातच उतरावे लागेल.