रेणापूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील महापूर ग्रामपंचायतीने सर्वांगीण विकासाच्या विविध उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात आघाडी घेतली असून, पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीमार्फत गावात मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी, स्वच्छता अभियानात सातत्य, तसेच लोकोपयोगी योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील पथकाने नुकतेच महापूर ग्रामपंचायतीचे मूल्यांकन केले असता विविध निकषांवर ग्रामपंचायत उत्कृष्ट ठरल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. गावच्या सरपंच कल्पना माने यांच्या नेतृत्वाखाली, ग्रामपंचायत अधिकारी अनंत सूर्यवंशी व सर्व सदस्यांनी अभियानाच्या सुरुवातीपासूनच पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबविले. यात स्वच्छता मोहीम, शिक्षण व आरोग्यविषयक जनजागृती, झाडे लावा-झाडे जगवा’, वनराई बंधारे, बचत गटांचे प्रबोधन, उडाण’ अंतर्गत महिला गटांना कर्जवाटप, ग्रामसभांमध्ये महिलांचा वाढता सहभाग, युवक शिबिरे तसेच थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे.
याशिवाय गावात स्वच्छता, सजावट, रंगरंगोटी आणि बोलक्या भिंती’सारख्या संकल्पनांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांची दखल घेत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी, वित्त व लेखा अधिकारी वाघ, तसेच लातूरचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले व इतर विस्तार अधिका-यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. या सर्वसमावेशक कामगिरीच्या जोरावर महापूर ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुरस्कार मिळवेल, असा विश्वास सरपंच माने व्यक्त केला आहे.

