36.7 C
Latur
Thursday, March 26, 2026
Homeमहाराष्ट्रचिंचुका, बनावट खडे, नकली साप अन् ‘एल्विश हनी’ चा वापर करत भाविकांना गंडवले

चिंचुका, बनावट खडे, नकली साप अन् ‘एल्विश हनी’ चा वापर करत भाविकांना गंडवले

भोंदू अशोक खरात याचे काळेधंदे उघडकीस

नाशिक : प्रतिनिधी
स्वत:ला ‘कॅप्टन’ म्हणवणा-या अशोक खरातने श्रद्धा, भीती आणि अंधविश्वासाचा आधार घेत भोळ्या-भाबड्या लोकांना जाळ्यात ओढत मोठा आर्थिक आणि लैंगिक शोषणाचा कारभार उभा केल्याचे समोर आले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बाजारात सहज मिळणारे चिंचोके आणि बनावट खडे ‘दैवी शक्तीच’ असल्याचे सांगून खरात हजारो ते लाखो रुपयांना विकत होता. एका चिंचोक्यासाठी तब्बल एक लाख रुपये उकळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
एकूणच, चिंचोके, खडे, नकली साप आणि महागडा मध अशा विविध माध्यमांतून अशोक खरातने फसवणुकीचे जाळे उभे केले होते. आता या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नकली सापाने भीती निर्माण
नाशिकच्या धार्मिक प्रतिमेचा फायदा घेत खरातने ‘सर्पपूजा’चा प्रकार राबवला. दरबारात तंत्र-मंत्राच्या नावाखाली तो ध्यानस्थ बसत असे आणि काही वेळाने २० फुटांचा नाग प्रकट झाल्याचा आभास निर्माण केला जात असे. प्रत्यक्षात हा साप बनावट असून, रिमोट किंवा इतर यंत्रणेद्वारे तो हलवला जात असल्याची माहिती तपासात समोर येत आहे.

‘एल्विश हनी’च्या नावाखाली उकळपट्टी
फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे ‘तुर्की मध’ किंवा ‘एल्विश हनी’ विक्री. हा मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करत खरात अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना विकत होता. विशेष म्हणजे, एका किलो मधाची किंमत तब्बल ९ लाख रुपये ठेवली जात होती. हा मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहांमधून मिळतो, असा खोटा दावा केला जात होता.

ट्रस्टमार्फत पैशांचा व्यवहार
या माध्यमातून मिळालेली मोठी रक्कम खरात आपल्या ट्रस्टच्या नावावर जमा करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या व्यवहारांद्वारे काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

दरबारात बड्या व्यक्तींची वर्दळ
दरम्यान, सिन्नरच्या मिरगाव येथे मंदिर उभारून खरातने आपला ‘दरबार’ सुरू केला होता. ज्योतिष, अंकशास्त्र, पूजाविधी यांच्या नावाखाली तो लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करत असे. अपत्यप्राप्ती, वैवाहिक अडचणी, नोकरी, राजकीय भविष्य अशा कारणांनी अनेकजण त्याच्याकडे जात असत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR