छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यातील शेतक-यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पुकारलेल्या ‘बळिराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी भव्य ट्रॅक्टर रॅली काढत सरकारचा विरोध केला आहे.
आमच्यावर हवे तर गुन्हे दाखल करा, पण शेतक-यांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणारच! असे थेट आणि रोखठोक आव्हान अंबादास दानवे यांनी सरकारला दिले आहे. प्रशासनाकडून होणा-या संभाव्य कारवाईला किंवा गुन्ह्यांना न घाबरता आज मराठवाड्यातील सर्व ८ ही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठाकरे गटाचा भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’ धडकत असल्याचे ते म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वाभाडे काढले. विद्यमान सरकारची ही योजना कर्जमाफी नसून प्रत्यक्षात ‘कर्ज वसुली योजना’ आहे.
ठराविक रक्कम भरल्यानंतरच ५० हजार रुपये माफ होतील, अशा अनेक जाचक अटी सरकारने शेतक-यांवर लादल्या आहेत, अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणत्याही अटींशिवाय शेतक-यांची कर्जमुक्ती केली होती. मात्र, सध्याच्या सरकारने दिलेले ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून, त्यांनी शेतक-यांची फसवणूक केली आहे.
यापूर्वी पक्षाने निदर्शने आणि ‘रास्ता रोको’सारखी आंदोलने केली होती; मात्र आता शेतक-यांच्या कष्टाचे प्रतीक असलेले ट्रॅक्टर थेट रस्त्यावर आणून सरकारला जाग आणली जाईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन केवळ मराठवाड्यापुरते मर्यादित नसून आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
















