मुंबई : लोहगडावरुन ढकलून हत्या करण्यात आलेल्या केतन अग्रवाल केस प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. अशा शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरातील मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते? यामागे सामाजिक अँगल तपासला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचवेळी नसरापूर प्रकरणात न्यायालयाने जलदगतीने तपास पूर्ण केला असून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली.
पुण्यातील लोहगड केसमध्ये केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी हत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनला पोलिसांनी अटक केली आहे. लोहगड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना खरोखरच अनाकलनीय आहे. समाज म्हणून आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. शिकल्या सवरलेल्या, चांगल्या घरच्या मुलांमध्ये अशी सूडबुद्धी का तयार होते? यामागे गुन्हेगारीसोबतच सामाजिक अँगल तपासला गेला पाहिजे.
नसरापूरच्या नराधमाला मृत्यूदंड होणार
नसरापूरमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. येत्या २९ जून रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नसरापूर प्रकरण हे दुर्मिळ प्रकरण असून दोषीला शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे, ती न्यायालय मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. न्यायालयाने सुटीच्या काळातही ही केस सुरू चालवली आणि विक्रमी वेळेत निकाल दिला. या केसमुळे पुन्हा अशा घटना घडल्या तर त्यामध्ये जलदगतीने शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
















