पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात २३ हून अधिक ठिकाणी, तर राज्यात एकूण ६५ ठिकाणी मोठी छापेमारी केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संशयास्पद नेटवर्कशी संबंधित देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या सूचनेवरून शहजाद भट्टी आणि त्याचे साथीदार भारतात छुपे नेटवर्क चालवत होते.
हे संशयित फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतीय तरुणांच्या संपर्कात येत होते.
तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांना सुरुवातीला पैशांचे आमिष, प्रसिद्धी किंवा परदेशात स्थायिक होण्याच्या भूलथापा दिल्या जात होत्या. अनेक बेरोजगार आणि संवेदनशील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जात होता.
एटीएसने १० जुलै २०२६ रोजी पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक आणि इतर शहरांसह राज्यभरात एकाच वेळी धाडी टाकून मोठी मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण राज्यातून जवळपास ११२ हून अधिक संशयित लोकांची कसून चौकशी करण्यात आली आहे.
पुण्यात यापूर्वी चाकण, वारजे आणि शिरूर परिसरातील तरुणांची या संदर्भात चौकशी करण्यात आली होती आणि त्यांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले होते. शहजाद भट्टीच्या या मॉड्युलचा मुख्य हेतू भारतातील संवेदनशील ठिकाणांची माहिती मिळवणे, फोटो/व्हीडीओ गोळा करणे आणि भविष्यातील घातपातासाठी स्लीपर सेल्स तयार करणे हा होता. भारताच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणा-या या ‘हायब्रीड वॉरफेअर’चा बीमोड करण्यासाठी एटीएसने कडक पावले उचलली आहेत.ालली असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
















