लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर शहरातील संत गोरोबा सोसायटी प्रभाग क्रमांक ३ येथे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वालंबी करण्यासाठी स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन अॅग्री लि. च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना कौशल्यावर आधारित विविध प्रशिक्षण देण्यात येत आहेत. प्रशिक्षणाबरोबरच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वालंबी करण्यासाठी स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी अशा योजनांची ही मदत होईल.
यावेळी रियाज शेख जिल्हा समन्वयक मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिंमिटेड, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी लक्ष्मीकांत कैले, व्यवसाय सुविधा केंद्र, आदित्य देशमुख, तांत्रिक व्यवस्थापक फिल्ड ऑफिसर प्रतीक देशमुख यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध उद्योग व स्वयंरोजगार योजनांची सविस्तर माहिती दिली. रियाज शेख यांनी उद्योग सुरू करण्यासाठी उपलब्ध अनुदान, कर्ज योजना, प्रशिक्षण, मार्गदर्शन, लागणारे कागदपत्रे व व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणती प्रक्रिया असते या संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले आणि उद्योजकता विकासाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या विभाग प्रमुख संगीता मोळवणे, महानगरपालिका स्थायी समितीचे सदस्य विकास कांबळे, काँग्रेसचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी व विलासराव देशमुख फाउंडेशनचे समन्वयक गजानन बोयणे, सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे तसेच संत गोरोबा सोसायटी प्रभाग क्रमांक ३ व परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या जनजागृती कार्यक्रमामुळे शासनाच्या उद्योगविषयक योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
















