बीजिंग : चीनमध्ये दीर्घकाळ ‘वन चाइल्ड पॉलिसी’ लागू होती. या धोरणामुळे देशात महिलांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. आता अनेक तरुणांना लग्नासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. या संकटाचा फायदा घेत काही ठिकाणी तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
चीनमध्ये अनेक दशकांपासून लागू असलेल्या ‘वन चाइल्ड पॉलिसी’ने आता देशातील तरुणांसमोर मोठे संकट उभे केले आहे. एकुलते मूल मुलगा असावे, या मानसिकतेमुळे आज चीनमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या सुमारे ३ कोटींनी अधिक झाली आहे. त्यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी वधू मिळत नाही. अनेक जण मुलीच्या शोधात भटकत आहेत. याच परिस्थितीचा फायदा आता फसवणूक करणारे घेत आहेत. चीनमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये ‘फ्लॅश मॅरेज’ म्हणजेच तातडीने लग्न लावून देण्याचे आश्वासन देणा-या बनावट विवाह संस्था आणि मॅरेज ब्युरो अविवाहित तरुणांना लक्ष्य करत आहेत. अशा एजन्सी काही दिवसांतच साधी आणि घरगुती मुलगी लग्नासाठी मिळवून देण्याचे आश्वासन देतात.
त्याबदल्यात पुरुषांकडून लाखो युआन उकळले जातात. मात्र, लग्न झाल्यानंतर काही दिवसांत किंवा महिन्यांत नववधू पैसे घेऊन फरार होते. काही वेळा तर संपूर्ण लग्नच बनावट असल्याचे समोर येते. या परिस्थितीमुळे चीनमधील तरुणांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. अशीच एक घटना ३७ वर्षीय वांग झुआंग यांच्यासोबत घडली. या वयापर्यंत त्यांनी लग्नाची आशाच जवळपास सोडून दिली होती. मात्र, एके दिवशी त्यांना एका मॅरेज एजन्सीची जाहिरात दिसली. अखेर आपला वधूचा शोध संपणार, असे त्यांना वाटले. एजन्सीने चांगली मुलगी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वांग यांनी एजन्सीची फी, वधूसाठीची रक्कम आणि लग्नाचा खर्च मिळून सुमारे ४४ हजार डॉलर दिले.
चीनमध्ये मुलींची कमतरता का निर्माण झाली?
चीनमध्ये दीर्घकाळ लागू असलेल्या ‘वन चाइल्ड पॉलिसी’मुळे देशात महिलांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. सध्या चीनमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या सुमारे ३ कोटींनी अधिक असल्याचे सांगितले जाते. यामुळे वधूच्या कुटुंबीयांची मागणीही वाढली आहे. विशेषत: लहान शहरे आणि ग्रामीण भागात लग्नासाठी पुरुषांकडून घर, कार, कौटुंबिक व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणात ‘ब्राइड प्राइस’ म्हणजेच वधूसाठी मोठी रक्कम मागितली जाते. या परिस्थितीचा फायदा घेत काही मॅरेज एजन्सी तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘३ दिवसांची भेट, ३ वर्षांच्या डेटिंगपेक्षा चांगली’ अशा प्रकारच्या जाहिराती करत आहेत. लग्नाची तीव्र इच्छा असलेल्या तरुणांना या जाहिरातींच्या माध्यमातून जाळ्यात ओढले जाते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात.
















